लोणी काळभोर – २७ डिसेंबर २०२४ रोजी
थेऊर येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय ३२) यांचा उपचारादरम्यान १ जानेवारी २०२५ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. २७ डिसेंबर २०२४ रोजी काही व्यक्ती थेऊर गावाशेजारी असलेल्या एका प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत होते .. अक्षय चव्हाण यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाद उफाळला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी अक्षय आणि त्यांच्या पत्नी शीतल यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर हवेत गोळीबार केला, ज्यामुळे शीतल गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी त्वरित कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सतीश बारीकराव लोखंडे (वय ३१), अजय दशरथ मुंढे (वय २६), आणि भानुदास दत्तात्रय शेलार (वय ३२) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. मात्र, आणखी तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
शीतल चव्हाण यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दुर्दैवी घटनेमुळे थेऊर आणि आसपासच्या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपास सुरू असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके कार्यरत केलेले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलेला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज काकडे यांनी सांगितले .
पोलिसांची केवढी ही तत्परता
शितल चव्हाण यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला . त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण झाले आल्याची माहिती मिळताच हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख ,लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट व त्यांचा फौजफाटा घेऊन रुग्णालयात दाखल झाले . रुग्णालयाभोवती कडे कोड बंदोबस्त ठेवला . नातेवाईकांची समजूत काढण्यात पोलिसांना यश आले .रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हे पोलिसांना कळताच पोलिसांनी तत्परतेने रुग्णालय व परिसरात बंदोबस्त वाढवला परंतु २७ तारखेपासून एक तारखेपर्यंत या गुन्हयातील फरार असलेले तीन आरोपी पकडण्यात अजून पर्यंत यश आले नाही .परंतु रुग्णालयासाठी पोलिसांनी तत्परतेने बंदोबस्त वाढवला त्यामुळे नागरिकांच्या मध्ये पोलिसांनी रुग्णालयासाठी केलेल्या तत्परतेची चर्चा चांगलीच रंगली होती .रुग्णालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते .



















