आळंदी म्हातोबाची येथील प्रकार
लोणी काळभोर – श्री म्हातोबा उर्फ भैरवनाथ ट्रस्ट आळंदी म्हातोबा यांच्या अंतर्गत असलेल्या जमिनीबाबत सुरू असलेले दावे व त्याचे काम पाहण्यासाठी तसेच जमिनीची देखभाल करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने ग्रामसभेच्या माध्यमातून एक कृती समिती स्थापित करण्यात आली होती.परंतु कृती समिती स्थापून अनेक दिवस झालेले असताना देखील देवस्थानच्या जमिनीबाबत निर्णायक भूमिका कृती समितीला घेता आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.याउलट देवस्थानच्या या जमिनीवरच अनेक अतिक्रमणे झालेली असून ती काढण्या बाबत कोर्टाचा तसेच पी एम आर डी चा आदेश असून देखील कृती समिती नेमकी कशाची वाट पाहत आहे हे कळण्यास मार्ग नाही.मध्यंतरी कृती समितीने सदरील जमीन मोजलेली होती त्यामध्ये अतिक्रमणे काढूनहद्द निश्चिती करण्याचे ठरले होते परंतु त्याचे देखील पुढे काय झाले हे कळले नाही.हे जर असेच सुरू राहिले तर एक दिवस देवस्थानच्या जागेवर त्रयस्थ व्यक्तीचा ताबा आल्याशिवाय राहणार नाही.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध वर्तमानपत्रात सदरील जागा विक्री बाबत नोटीस आली होती.त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत जमीन विकण्याचा प्रयत्न हाणून पाडला.तसेच काही दिवसांपूर्वी बाहेर गावातील व्यक्तीने सदरील जमीन आमची आहे ती आम्हाला परत द्यावी या आशयाचे पत्र राज्यातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच इतर अधिकारी यांना पाठविले होते येवढे होऊन देखील कृती समिती जर शांत बसत असतील तर कृती समितीचे नेमके काय सुरू आहे हे एक प्रश्नचिन्ह तयार झालेले आहे.
मध्यंतरी ग्रामस्थांच्या माध्यमातून सदरील ट्रस्टच्या जमिनीचा विकास करायचा असा निर्णय ग्रामस्थानी घेतला होता युद्धपातळीवर या जमिनीचा विकास करण्याबाबत ग्रामस्थ प्रयत्न करत होते परंतु त्यामध्ये देखील अनेक अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.मुद्दामहून यामध्ये अडथळे आणले जात आहे.वेळोवेळी शासनाने आदेश देऊन देखील त्याबाबत कार्यवाहीला कृती समितीने बगल दिल्याने आता या क्षेत्राच्या विकासाला बाधा पोहचत आहे.मागील अनेक वर्षांपासून एवढी मोठी जमीन तशीच पडून आहे त्यामुळे सदरील जमीन लागवडीखाली आणली तर देवस्थानचा तसेच गावाचा विकास होईल असा प्रांजळ हेतू ग्रामस्थांचा असून देखील ट्रस्टचा विकास होऊच द्यायचा नाही असा चंग काही ग्रामस्थानी बांधल्याने व कृती समिती शांत बसते गावपातळीवर काहीही करू शकत नाही ही धारणा पक्की झाल्याने या विकासात्मक कामात जाणूनबुजून अडचणी आणल्या जात आहे.
त्यामुळे झोपलेल्या कृती समितीच्या सदस्यांनी त्वरित याबाबत पावले उचलावी अन्यथा कालांतराने गावाच्या हातात राहिलेली ही जमीन देखील इतरांच्या घशात जाणार हे मात्र नक्की आहे.



















