मांजरी येथे रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता
लोणी काळभोर प्रतिनिधी – मांजरी गाव हे झपाट्याने विकसित व नागरिकीकरण झालेले गाव असून पुणे महानगरपालिकेत याचा समावेश करण्यात आला आहे .समावेश झाल्यानंतर नागरिकांना सुविधा मिळणे तर राहिले दुर अनेक असुविधाचां सामना करावा लागत आहे .त्यामध्ये गावातून जाणाऱ्या रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झालेली दिसते .मांजरी गावातून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेत ते खड्ड्यात रस्ते आहेत हेच कळत नाही. मांजरी गावातून अनेक ठिकाणाहून पुणे – सोलापूर व पुणे अहिल्यानगर मार्ग महामार्गावर जाता येते.

शेवाळेवाडी येथून मांजरीला जाण्यासाठी मधला मार्ग म्हणजे दिपकनगरचा रस्ता (दरडीचा रस्ता ) . हा रस्ता मांजरी रेल्वे पुलाशेजारुन जात आहे . मांजरी बाजुने सुरुवातीला येथे रस्त्याच्या शेजारी मोठा खड्डा पडला असुन त्या मध्ये पाणी साठल्यामुळे वाहन चालकांना खड्डा पाण्यामुळे दिसत नसल्याने येथे वाहने जोरात आपटतात .अनेक वाहनांचे यामुळे नुकसान झाले आहे . पुढे येथून जाताना अनेक ठिकाणी गतिरोधक असुन जवळपास पंचवीस गतिरोधकावरुन जावे लागते .आणि आता तर या रस्त्याची चाळण झाली असुन रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. चांगला रस्ता फक्त नावापुरताच राहीला आहे .नागरिक येथून जाताना रस्ता शोधत आहेत .पण त्यांना रस्ता न दिसता नुसते खड्डेच दिसत आहेत .या रस्त्यावर अनेक मोठ्या सोसायटयांचे गृहप्रकल्प आहेत . तसेच दोन इंटरनॅशनल शाळा सुद्धा या रस्त्यावरच आहेत.

त्यामुळे नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा या रस्त्याने जाताना अनेक अडचणींचा सामना करत खड्डे चुकवत स्कूल चले हम असे म्हणावे लागते . त्यातच वाहनचालकांना वाहन चालवताना खुपच त्रास होत आहे . या रस्त्यावरुन जाताना मार्ग काढणे अतिशय त्रासदायक होत आहे .
दुसरा खड्डेमय रस्ता म्हणजे पुणे – सोलापूर महामार्गावरून मोरे वस्तीवरून पुणे – अहिल्यानगर महामार्गाला जोडणारा रस्ता होय . पुणे -सोलापूर महामार्ग सोडल्यास येथून जाताना अनेक ठिकाणी आपल्याला खड्डे दिसतात तसेच बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग येथे साठलेले असून नागरिकांना एका हाताने नाकाला रुमाल धरावा लागतो तर एका हाताने खड्डे चुकवत वाटचाल करावी लागते .

येथून नदीचा पूल ओलांडून थेऊर ,केसनंद ,आव्हाळवाडी , कोलवडी ,वाडे बोल्हाई ,वाघोली अशा अनेक गावांना या रस्त्याने जाता येते . पुणे – अहिल्या नगर महामार्ग वर जायला हा रस्ता जवळचा आहे परंतु येथे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांची वाट बिकट होत चालली आहे.
मांजरी ग्रामपंचायत पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना सर्व सुविधा मिळतील अशी आशा होती परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरले आणि खड्डे युक्त रस्ते मांजरी ग्रामस्थांच्या नशिबी आले आहेत .



















