झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार
लोणी काळभोर प्रतिनिधी – अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर गेल्या वर्षभरापासून मोठमोठे खड्डे पडले आहेत .ज्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जेऊर ,पांढरी पुल ,घोडेगाव, वडाळा बहिरोबा, शिंगवे तुकाई फाटा, आणि धनगरवाडी या परिसरात खड्ड्यांची संख्या जास्त आहे .
अहिल्यानगर (अहमदनगर) ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हा महामार्ग राज्य महामार्ग असल्याने त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. या रस्त्याने जाताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता हे कळतच नाही .या खड्ड्यांमुळे वाहनांची गती अतिशय संथ होऊन वाहतुकीची कोंडी व अपघात वाढले असून सामान्य अंतर पूर्ण करण्यास तिप्पट वेळ लागत आहे .या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असुन सुद्धा बांधकाम विभागाचे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे . हा रस्ता राज्य मार्ग आहे की एखाद्या गावात जाणारा रस्ता आहे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे .वास्तविक पाहता अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर ही शहरे अतिशय सुधारित असून एमआयडीसीमुळे येथे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे .अनेक मोठे प्रोजेक्ट या दोन्ही शहरामध्ये आहेत . तरी देखील या दोन्ही शहराला जोडणारा रस्ता इतका दुर्लक्षीत होऊ शकतो .याचे आश्चर्य या रस्त्यावरुन जाताना कळते . या रस्त्यावरुन जाताना
वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त असून सुद्धा झोपलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाही .सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन चालकांना व प्रवाशांना होणाऱ्या त्रासा कडे बघुन ताबडतोब रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .



















