
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांजळेंसाठी सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी रमेश वांजळे उभा आहे असंच तुम्हाला वाटेल असं समजूनच मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. तसंच पुन्हा एकदा शरद पवार आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
शरद पवार यांच्या बारामतीत जा. तिकडे गेल्यावर लक्षात येईल किती तरी उद्योग, इंडस्ट्री शरद पवारांनी त्या एका तालुक्यात आणले आहेत. मग शरद पवारांना माझा प्रश्न आहे की जर बारामती तालुक्यात तुम्ही इतके उद्योग, व्यवसाय आणू शकता तर मग ते महाराष्ट्रात का आणले नाहीत? आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातला नेता का म्हणायचं? जो महाराष्ट्रात उद्योगधंदे, इंडस्ट्री आणेल, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवेल तो महाराष्ट्राचा नेता. जो आपल्या तालुक्यात व्यवसाय, उद्योग आणतो तो तालुक्याचा नेता. जाणता राजा वगैरे तर नंतरचीच गोष्ट. असा टोला राज ठाकरेंनी शरद पवारांना लगावला आहे.



















