निष्ठावंत सुरज चौधरी यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डावलल्याने पुर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्ल नाराजी
लोणी काळभोर प्रतिनिधी – जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अखेरच्या क्षणी मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सुरज चौधरी यांनी अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, पक्षाकडून अचानक दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुरज चौधरी यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्यांनाच शेवटच्या क्षणी बाजूला सारल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच निष्ठावंतांची निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेशीवर टांगली असुन पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्यांना पक्ष वाळीत टाकत असल्याची भावना कोरेगाव मुळ गणातील मतदारसंघात झाली आहे .
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुरज चौधरी यांनी भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,
“मी राजकारणात आलो तो पदासाठी नाही, तर विचारांसाठी. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं. आनंदात नाही तर अडचणीच्या काळात पक्षासोबत उभा राहिलो. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केली . पण पक्षाने
निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडून गणाच्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊन एक प्रकारे निष्ठावंतावर अन्याय केला आहे. मात्र पक्षाने शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मनाला मोठी वेदना झाली. तरीही माझा संघर्ष थांबणार नाही. जनतेवर विश्वास ठेवून आणि स्वाभिमान जपून मी हा निर्णय घेतला आहे.”
या निर्णयामुळे ‘निष्ठेला किंमत आहे की फक्त राजकीय गणितालाच?’ असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याची ही घटना निवडणुकीच्या तोंडावर पक्षासाठी अडचणीची ठरणार का, याबाबत राजकीय जाणकारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
सुरज चौधरी यांच्या उमेदवारीमुळे संबंधित मतदारसंघात निवडणूक अधिकच रंजक, चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, निष्ठा विरुद्ध सत्ता-समीकरण हा संघर्ष आता थेट मतपेटीपर्यंत जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.



















