हडपसर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन व उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून अण्णासाहेब आवटे कॉलेजचे माजी उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विलास सदाफळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी भूषविले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विलास सदाफळ म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समाजसेवा हा उत्तम मार्ग आहे. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. युवकांमध्ये आत्मविश्वास, नैतिक मूल्ये व सामाजिक भान निर्माण करण्याचे कार्य एन.एस.एस. करत आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश साळुंखे यांनी नमूद केले की, “महाविद्यालयातील युवक विविध सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करत असून चारित्र्यसंपन्न युवक घडविण्याचे कार्य करीत आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती किरवे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अजित जाधव यांनी करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. सोपान आयनार यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. छाया सकटे यांनी पार पाडली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. संजय जगताप यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















